मराठी भाषा, संस्कृती व मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना..


नमस्कार मराठी बंधु-भगिनींनो,

मराठी भाषा, संस्कृती व मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम करत आहे. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हे पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. या दृष्टिकोनातून पक्ष वेगवेगळ्या पातळीवरून प्रयत्न करत आहे. विविध क्षेत्रांत ‘मराठीचा वापर व सन्मान’ यासाठी पक्ष आंदोलने करतो आहे, कार्यक्रम- उपक्रम-प्रकल्प राबवतो आहे.
नुकतीच पक्षाध्यक्ष मा. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील बहुचित्रपटगृहांत (मल्टिप्लेक्समध्ये) मराठी चित्रपट अधिक प्रमाणात दाखवावेत अशी आग्रही मागणी केली. चित्रपटसृष्टीची जननी असलेल्या महाराष्ट्रातच मराठी चित्रपट कमी प्रमाणावर दाखवले जातात. तसेच दर्जेदार नाटकांची परंपरा असलेल्या नाट्यक्षेत्राकडे मराठी माणूसच पाठ फिरवत आहे. निर्माते, दिग्दर्शक व अन्य मराठी कलाकार चित्रपट व नाटकांच्या माध्यमातून अनेक चांगले विषय, उत्कृष्ट सादरीकरणासह सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करतात. परंतु बहुचित्रपटगृहांत मराठी चित्रपट खूपच कमी प्रमाणात दाखवले जातात. त्यामुळे साहजिकच प्रेक्षकांकडून मराठी चित्रपटांकडे दुर्लक्ष केले जाते. या पार्श्वभूमीवर मा. राज ठाकरे यांनी ’बहुचित्रपटगृहांनी मराठी चित्रपट दाखवावेत‘, अशी सूचना केली आहे. तसेच मराठी रसिक-प्रेक्षकांनी चित्रपट व नाटकांना उदंड प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले आहे.

मराठी भाषा, संस्कृती, साहित्य ह्या गोष्टी जशा महत्त्वाच्या आहेत, तशाच लोकांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या पायाभूत सोयीसुविधादेखील महत्त्वाच्या आहेत. रस्ते, वीज, आरोग्य, वाहतूक या विषयांवरही मा. पक्षाध्यक्षांचे व पक्षाचे लक्ष आहे. मुंबईतील (तसेच अन्य मोठ्या शहरांतील) लोकांना रोज वाहतुकीच्या समस्येला तोंड द्यावे लागते. मुंबईतील विस्कळीत झालेल्या वाहतुकीच्या संदर्भात मा. राज ठाकरे यांनी वाहतूक शाखेचे आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली. शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न, भाडे नाकारणारे टॅक्सी व रिक्षाचालक, विनापरवाना रिक्षा-टॅक्सी चालवणारे, एकाच परवान्यावर अनेक रिक्षा-टॅक्सी अशा विविध समस्यांबाबत मा. अध्यक्षांनी विवेक फणसळकर यांच्याशी चर्चा केली. तसेच टॅक्सी/रिक्षा चालकाची सर्व माहिती त्याच्या छायाचित्रासह टॅक्सीत/ रिक्षात असावी, विनापरवाना टॅक्सी/रिक्षा चालवणार्‍यांच्या विरोधात कारवाई करावी अशा अनेक मागण्या मा. राज ठाकरे यांनी यावेळी केल्या. त्याचबरोबर टोल वसूल करणार्‍या ठेकेदारांनी संबंधित रस्त्यांवर पडणार्‍या खड्‌ड्यांची जबाबदारी घेतली पाहिजे. एखादा मोठा अपघात झाल्यास या टोल वसूल करणार्‍या कंपन्यांनी क्रेन, रुग्णवाहिका, अग्निशमन यांसारख्या अन्य साधनसुविधाही उपलब्ध करून दिल्या पाहिजेत अशी मागणीही त्यांनी केली. याच मागण्या घेऊन मा. पक्षाध्यक्ष परिवहन आयुक्त दिलीप जाधव यांनाही भेटले.

वरील दोन्ही विषयांबाबत पक्षाध्यक्ष मा. राज ठाकरे यांनी मांडलेल्या मतांकडे आपण आवर्जून लक्ष द्यावे, ही विनंती. मा. राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपण जास्तीत-जास्त मराठी चित्रपट व नाटके पाहावीत. त्यामुळे मराठी भाषा, साहित्य, वाड्:मय व चित्रपट - नाट्य क्षेत्रे सर्वार्थाने वृद्धिंगत होतील. तसेच वाहतूकविषयक समस्या सोडविण्यासाठी आपण प्रत्येकानेही प्रयत्न केले पाहिजेत. आपली नागरी कर्तव्ये पार पाडायला हवीत. वाहतुकीसंदर्भात काही समस्या असेल, तर ती आपण स्थानिक कार्यकर्त्यांना जरूर दाखवून द्यावी. तसेच स्थानिक समस्या (योग्य तपशीलासह ) संकेतस्थळाच्या माध्यमातून आमच्याकडे जरूर पाठवावी.

आपला नेहमी संवाद-संपर्क असतोच, आपले सहकार्यही असतेच. असेच सहकार्य कायम मिळावे ही नम्र अपेक्षा!
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

मी एक महाराष्ट्रीयन, एक मराठी........

नमस्कार ! मी एक महाराष्ट्रीयन, एक मराठी. एका खेड्यात राहणारा शेतकरी आणि विद्यार्थी.

१२ वी पर्यंतच शिक्षण होईपर्यंत मी म्हणजे "एक डबक्यात राहणारा बेडूक होतो". माझा गाव आणि माझा तालुका एवढाच माझ विश्व. मराठी सोडून दुसरया कोणत्याच भाषेचा संबंध नाही. आम्ही सर्वच शेतकरी मराठी लोक. जिल्हा सोडून जान मला कधी जमलच नाही. असा जिल्हा कि जिथ "शिवाजी महाराज कि" म्हटलं कि तोंडातून नकळत "जय" असा बाहेर पडत. आज हि या खेड्यांतून शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या टापांचा आवाज आहे असा ऐकू येतो.


१२ वी नंतर अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेण्यासाठी वेगवेगळ्या महाविद्यालयांना भेट देत होतो. अशाच एका महाविद्यालयात चौकशी साठी बसलो होतो. समोर एक मुलगा व त्याच्याबरोबर त्याचे आई बाबा होते. पोषाखा वरून स्पष्ट शेतकरी दिसत होते. एका शाखेच्या अंतिम जागेसाठी ते थांबले होते. आणि दुसरया बाजूला त्याच जागेसाठी बक्कळ पैसा घेऊन आलेला एक परप्रांतीय मुलगा व त्याचा बाबा आला होता. कार्यालयाच्या लोकांनी त्या दोन कुटुंबांना वेगवेगळ बसवून त्यांच्यात अप्रत्यक्ष रित्या त्या जागेसाठी लिलावच चालू केला होता. लिलाव म्हणजे कोन अनुदान जास्त देणार? शेतकरी कसा तरी रु. १,२०,००० पर्यंत पोहचला. पण परप्रांतीय थांबला नाही. त्या मराठी मुलाच्या आईने दागिन्यांचा विषय काढल्यावर तो शेतकरी कसा बसा रु. १,९०,००० पर्यंत पोहचला. पण शेवटी विजय त्या पराप्रांतीयाचाच झाला. आयुष्यात पहिल्यांदाच मला एक शेतकरी असल्याची लाज वाटू लागली होती. प्रवेश मिळाला नाही म्हटल्यावर त्या मुलाच्या व आईच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. ते पाहून माझ मन भरून आल. क्षणाचाही विलंब न करता त्या महाविद्यालयाची शुद्ध मराठीत आरती करत मी तिथून बाहेर पडलो. परप्रांतीयांसाठी राखीव जागा असताना ही, केवळ पैश्यांसाठी महाविद्यालये परप्रांतीयांकडून जास्त जागा भरून घेत आहेत.

मी दुसरया महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालय चालू झाले. मी स्वतःचा गाव सोडून शिक्षणासाठी दुसरया शहरात राहत होतो. असाच एक दिवस खानावळीत दूरदर्शन वरील "चालता बोलता" हा कार्यक्रम बघत होतो. त्यात पाचवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारला होता. मुलगा इंग्रजी माध्यमाचा होता. प्रश्न :भारताच्या झेंड्यात रंग किती व कोणते? विशेष म्हणजे त्या मुलाला या प्रश्नाचे उत्तर आले नाही. खास करून हे घडतंय ते मुंबई , पुणे, नाशिक, नागपूर सारख्या मोठ्या शहरांतून. अशा शहरातून अशी किती मुले आहेत कि ज्यांना "श्यामची आई" हे पुस्तक किंवा साने गुरुजी, बाबू गेनू हे माहित आहेत? जी मुलं इंग्रजी माध्यमातून शिकतात त्यांना तर आपला इतिहास काहीच माहित नसतो. आणि तरीही लोकांना आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमामध्ये शिकवायची हौस.

नंतर तिसऱ्या वर्षात असताना मला दोन मित्र मिळाले. ते जुळे भाऊ होते, तेही मराठा. पण ते चक्क हिंदीतून बोलत होते. त्यांच्याच शहरातून आलेले आणखी काही मित्र होते, सगळी मराठी, पण सगळे हिंदीतूनच बोलत होते. का? अस विचारलं असता त्यांच्याकडे उत्तर नव्हत. बहुतेक त्यांना मराठीची लाज वाटत असावी. अरे थू असल्यांच्या आयुष्यावर. आणि हेच चित्र आज मुंबई, ठाणे आणि पूर्व महाराष्ट्रात दिसत आहे.

विदर्भातील काही मित्र भेटले. १२ वी विज्ञान चांगल्या गुणांनी पास झालेले. पण खर सांगायचं तर त्यांना विज्ञानाचा "वि" पण माहित नव्हता. त्यांनी स्पष्ट सांगितले कि १२ वि पर्यंत खुद्द शिक्षकच नक्कल मारून देतात. याच मित्रांचे अभियांत्रिकीचे शिक्षण चालू असताना ते अजून एका म्हणजे विदर्भातील विद्यापीठातून दुसऱ्या पदवीसाठी शिकत होते. जो एक गुन्हा आहे. यावर त्यांच म्हणन अस कि दाखला हरवला अस भासवून नवीन दाखला मिळवायचा, प्रवेश घ्यायचा आणि परीक्षा कोणीही अगदी १० वी शिकणारा विद्यार्थी देईल आणि नक्कल मारून, शिक्षकांना पैसे देऊन पास पास होईन. अरे पण तुम्ही हे विसरताय कि, दुसऱ्या एका मराठी मुलाचा प्रवेश हिसकावून विनाकारण एक पदवी तुम्ही वाया घालवताय. त्यांना मराठी बाबत विचारलं असता त्यांनीही सांगितलं कि पूर्व महाराष्ट्रात हिंदीच प्रस्थ वाढत आहे.

माझं अभियांत्रिकी शिक्षण संपल आणि एका कामासाठी पहिल्यांदाच मुंबईला जाण्याची संधी मिळाली. आज पर्यंत मुंबई स्वप्नातच रंगवत होतो पण त्यादिवशी प्रत्यक्षात मुंबईला जाण्याची संधी मिळाली होती. मुंबईला भल्या पाहते एस. टी. मधून उतरलो. नवे शहर, नवे रस्ते. माहिती विचारण्याच्या हेतूने एका इसमाशी बोललो पण उत्तर मिळाले "हिंदी में बात करो". रिक्षावाले, taxi वाले सर्वांशी बोललो पण सगळे हिंदीच. दिवस संपला आणि मी परतीचा रस्ता धरला. मनात एक खंत होती कि पहाटेपासून संध्याकाळ पर्यंत मराठी ऐकायला मिळाले नव्हते. " आमची मुंबई महाराष्ट्रात आहे कि महाराष्ट्राच्या बाहेर आहे?" याचे मी उत्तर शोधत होतो.नकळत मी राज ठाकरेंच्या विचारसरणीला स्पर्श केला होता. स्वप्नातील आणि सत्यातील मुंबई यात तसूभरही साम्य नव्हते.

तुमच्या घरात पाहुणे आले तर तुम्ही किती दिवस त्यांचा पाहुणचार कराल? इथे पाहुण्यांनी आपल्या घरातच बस्तान मांडलं आहे. आणि आपल्या नात्यातल्या इतर कुटुंबांना घेऊन यायचा ध्यासच घेतला आहे जणू....

अजून लिहीण्यासारख आणि विचार करण्यासारख खूप आहे पण तुम्ही एवढा वेळ वाचाल कि नाही हि मनात शंकाच आहे.

शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांच्या जोरावर अनेक खस्ता खाऊन हे "स्वराज्य" आपल्याला दिले. पण आजही आपण त्याचे "सुराज्य" करण्यास असमर्थ आहे. का? एवढे षंढ, नामर्द, हिजडे आहोत आपण? मराठीचा "म" उच्चारातानाही उसळ्या मारणार आपल रक्त आज थंड का? आजची स्तिथी म्हणजे धड ताठ हि नाही आणि धड मोडलेली हि नाही, मराठी कणा आज चक्क वाकलाय? मराठी न बोलून आपणच चुकतोय. आपणच शेन खाल्ल तर दुसऱ्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे?

शेतकऱ्यांची आत्महत्त्या, मराठी शाळा बंद पडणे, शिक्षक शाळेत शिकवायच्या हेतूने जातो कि पगार घेण्याच्या हेतूने? विद्यार्थी ज्ञार्जनाच्या हेतूने जातो कि लाईन मारण्याच्या? घरात थोडी श्रीमंती आली कि मराठीची लाज आणि हिंदी, इंग्रजी आपलीशी का वाटते? आणि महत्वाच या कॉंग्रेस सरकरान यासाठी काय केलं? अशा किती तरी गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत....

अजून एक महत्वाची बाब मला इथे नमूद करावी वाटते कि आपल्या मराठी मुली यात कुठेतरी कमी पडत आहेत.
काय करायचं वा काय करायचं नाही हे मी तुम्हाला सांगणार नाही. ते तुमच तुम्हीच ठरवा. माझ कर्तव्य मी केलं आणि करतोय.

"मी आज शपथ घेतो कि मी मराठीचाच वापर करेन आणि आजूबाजूच्यांना त्यासाठी प्रवृत्त करेन. मग त्यासाठी दोन वाजवायला लागल्या तरी चालतील. मुलांना मराठी शाळेतच प्रवेश देईन. आणि प्रामाणिक पणे मी माझ्या मराठीची सेवा करत राहीन."

एक विनंती कि हा संदेश ई-मेल द्वारे तुमच्या सर्व मित्रांना पाठवण्याचा त्रास घ्यावा.

|| जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र ||

महाराष्ट्र नवनिर्माण सेना | MANASE|MAHARASHTRA NAVNIRMAN SENA|RAJ THACKERAY